नाना पटोलेंचा सवाल, म्हणाले…“…तेव्हा गृहमंत्री फडणवीस काय करत होते?

नागपूर: राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत शहरी नक्षलवादी होते, तर त्यावेळी गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस काय करत होते? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते. नाना पटोले पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप फक्त राहुल गांधी यांना भितात. संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपशब्द वापरून अमित शहा यांनी जे पाप केले ते लपवण्यासाठी संसद भवन परिसरात भाजपची नौटंकी सुरू आहे. भाजप राहुल गांधींना जितके बदनाम करण्याचा प्रयत्न करेल, तितक्या ताकदीने राहुल गांधी मजबूत होऊन पुढे येतील. भाजपचा अदाणीला देश विकण्याचा प्रयत्न आहे. अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काय संबंध आहेत, हे सर्वांना माहीत आहे. केंद्र सरकारने संसदेचा चुकीच्या पद्धतीने आखाडा केला आहे. लोकशाहीला संपणवण्याचा हा प्रयत्न आहे.फडणवीसांबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांची रॅली महाराष्ट्रातून गेली तेव्हा फडणवीस गृहमंत्री होते. तेव्हा तुम्हाला त्यात अनुचित प्रकार आढळला नाही. आता खोटे आरोप करून फडणवीस राज्यातील मूळ मुद्याहून नागरिकांचे लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे अकार्यक्षम पंतप्रधान आहे. ही गोष्ट फडणवीस खोटे आरोप करून लपवू बघत असल्याचाही आरोप नाना पटोले यांनी केला.