ठाणे

ठाणे परिक्षेत्रात लाचखोरीच्या संख्येत वाढ; गुन्ह्यांच्या प्रकरणांची पन्नाशी, कोणत्या भागात प्रमाण अधिक?

ठाणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे परिक्षेत्रात साडेपाच महिन्यांत लाचखोरीच्या गुन्ह्यांच्या संख्येने पन्नाशी गाठली आहे. याच कालावधीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा गुन्ह्यांच्या संख्येत ११ ने वाढ झाली आहे. तर, लाचेच्या एकूण ५० गुन्ह्यांपैकी ४९ गुन्हे तपासाधीन असून अभियोगपूर्व मंजुरीचे एक प्रकरण प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात दररोज कोठे ना कोठे लाच घेताना सरकारी अधिकारी, कर्मचारी पकडले जात आहेत. लाचखोरीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत असून चालू वर्षी राज्यात १ जानेवारी ते ११ जून या कालावधीमध्ये ३५० पेक्षाही जास्त लाचखोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एसीबीच्या नाशिक परिक्षेत्रामध्ये सर्वाधिक ८० गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे परिक्षेत्रात ६८, छत्रपती संभाजीनगर ६६ आणि ठाणे परिक्षेत्रामध्ये ५० गुन्हे दाखल झाले आहेत.

मागील वर्षीपेक्षा यंदा ठाणे परिक्षेत्रातील लाचखोरीच्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गतवर्षी साडेपाच महिन्यांमध्ये लाचेसंबंधी ३९ गुन्हे आणि दोन अपसंपदेचे गुन्हे दाखल झाले होते. यंदाच्या लाचखोरीच्या ५० गुन्ह्यांमध्ये लाच घेताना विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तीदेखील एसीबीच्या जाळ्यात अडकल्या असून एकूण आरोपींची संख्या ७० आहे. यावर्षी आतापर्यंत अपसंपदा आणि अन्य भ्रष्टाचाराचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच एकाही गुन्ह्यामध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. गेल्या साडेपाच महिन्यांत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये ११ गुन्हे लाच मागितल्याचे आहेत. कमीत कमी दीड हजारांपासून जास्तीत जास्त दोन लाखांपर्यंत लाच मागण्यात आलेली आहे. या गुन्ह्यांतही एसीबीने आरोपींना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button