Uncategorizedसत्ताकारण

हाथरस बलात्कार प्रकरणामुळे भाजपा अडचणीत? काँग्रेस-सपा भाजपाचा बालेकिल्ला भेदणार का?

हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत कोणताही उमेदवार उघडपणे बोललेला नाही. हाथरस लोकसभा मतदारसंघात दलित आणि ठाकूर यांचे वर्चस्व आहे.

२०२० साली घडलेल्या हाथरस प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. १४ सप्टेंबरला हाथरसमध्ये एका १९ वर्षीय दलित तरुणीवर चार उच्चवर्णीय पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. ११ दिवसांनंतर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिने प्राण सोडले. हाथरसमधील मतदार जातीच्या आधारावर विभागले गेले आहेत. बलात्कार पीडितेशी संबंधित चार कुटुंबे त्यांच्या उमेदवाराच्या पसंतीबद्दल मौन बाळगून आहेत; तर गावातील उच्चवर्णीय जातीच्या मतदारांनी भाजपाला मत देणार असल्याचे सांगितले आहे. ७ मे रोजी मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या हाथरस लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.गेल्या वर्षी मार्चमध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप सिंहला दोषी ठरवून, इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायालयाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. हाथरसमधील स्थानिक लोक या घटनेला ‘बिटिया कांड’ म्हणून संबोधतात. स्थानिक म्हणतात की, पूर्वी हिंग, होळीचे रंग व गुलाल पावडर यांच्या उत्पादनासाठी ओळखला जाणारा हा जिल्हा या घटनेनंतर बदनाम झाला.निवडणूक सुरू असल्याने या घटनेबाबत कोणताही उमेदवार उघडपणे बोललेला नाही. भाजपाने राज्याचे महसूलमंत्री अनूप प्रधान वाल्मीकी यांना हाथरसमधून उमेदवारी दिली आहे. समाजवादी पक्षाने (सपा) जसवीर वाल्मीकी, तर बहुजन समाज पक्षाने (बसप) हेंबाबू धनगर यांना उमेदवारी दिली आहे. हाथरस लोकसभा मतदारसंघात दलित आणि ठाकूर यांचे वर्चस्व आहे. त्यांची संख्या प्रत्येकी तीन लाख आहे. त्यानंतर या मतदारसंघात दोन लाख ब्राह्मण, दोन लाख वैश्य व ८० हजार मुस्लिम मतदार आहेत. भाजपाला फार पूर्वीपासून बिगर-जाटव दलितांचा पाठिंबा मिळालेला नाही. परंतु, उच्चवर्णीय जातींच्या मतांमुळे ही जागा फार पूर्वीपासून भाजपाचा बालेकिल्ला आहे.भाजपाने १९९१ पासून सलगपणे हाथरसची जागा जिंकली आहे. २००९ मध्ये आरएलडीने भाजपाचा मित्रपक्ष म्हणून ही जागा जिंकली होती. १९९६ व २०१४ दरम्यान प्रत्येक मतदानात बसप दुसऱ्या क्रमांकावर होता. २०१९ मध्ये जेव्हा सपा आणि बसप मित्रपक्ष होते, तेव्हा या जागेवरून सपा उमेदवाराने निवडणूक लढवली होती. त्यावेळी सपाचा उमेदवारही दुसऱ्या क्रमांकावर होता.

अजूनही पीडितेचे कुटुंब सीआरपीएफ जवान आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सुरक्षेत असून, गावात जाणे टाळत आहे. गावातील पहिले घर ठाकूर असलेल्या आरोपींच्या कुटुंबाचे; तर पुढील रस्त्यावरील घर पीडितेच्या कुटुंबाचे आहे. निवडणुकीत आपला पाठिंबा कुणाला, याबद्दल अद्याप पीडित कुटुंबाने आपली भूमिका मांडलेली नाही. परंतु, १४ एप्रिल रोजी डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘जय भीम’ अशा घोषणांचे दोन निळे झेंडे लावण्यात आले आहेत. पीडितेचे कुटुंब ज्या समुदायातून येते, त्या समुदायाचा पूर्वीपासून भाजपाला पाठिंबा राहिला आहे.

“त्यावेळी अनेक नेते स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भेटायला आले होते; पण आता माझ्या कुटुंबाची कोणी चौकशीसुद्धा करीत नाही. आम्हाला उत्तर प्रदेश सरकारकडून २५ लाखांची जी भरपाई मिळाली, ती आम्ही दैनंदिन खर्च आणि वकिलांची फी भरण्यासाठी वापरत आहोत. घर आणि सरकारी नोकरीची इतर आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत,” असे पीडितेच्या भावाने सांगितले. निर्दोष सोडलेल्या आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी मे महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयात होणार आहे. गावातील इतर तीन दलित कुटुंबे पीडितेचे नातेवाईक आहेत. उर्वरित गावात उच्चवर्णीय ठाकूर, ब्राह्मण व इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदाय आहेत

गावातील ठाकूर समुदाय आरोपींच्या पाठीशी उभे असल्याचे पाहायला मिळते. मुख्य आरोपी संदीपचे वडील गुड्डू सिंह म्हणतात की, ते भाजपाचे मतदार आहेत आणि त्यांच्या मुलावरचे सर्व आरोप खोटे आहेत. “येथील उच्च जातीचे लोक तत्कालीन भाजपा खासदार राजवीर दिलर यांच्यावर नाराज होते. कारण- त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. ती एक सज्जन व्यक्ती होती. परंतु, त्यांच्याच समाजाच्या (दलित) दबावाखाली त्यांनी या खटल्यात आणखी तीन जणांची नावे टाकली. मला विश्वास आहे की, याच कारणामुळे भाजपाने त्यांना तिकीट नाकारले,” असे गुड्डू सिंह सांगतात. राजवीर दिलर यांना पक्षाने यावेळी एकाही जागेवरून उमेदवारी दिली नव्हती. दिलर यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

ब्राह्मण समुदायातील योगेश पचौरी म्हणतात, “मला या प्रकरणाची वास्तविकता माहीत नाही. मला येथे ठाकूरांबरोबर राहावे लागेल. कारण- ते बहुसंख्य आहेत. मी एवढेच सांगू शकतो की, या प्रकरणामुळे माझ्या गावाची आणि हाथरसची बदनामी झाली आहे.” पचौरी यांनी स्पष्ट केले की, गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे यंदाही ते भाजपाला मतदान करतील.

भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद माहेश्वरी म्हणतात की, सामूहिक बलात्कार प्रकरण हा निवडणुकीचा मुद्दा नाही आणि हाथरस हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने पक्षाचा विजय निश्चित आहे. “इथे हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. भाजपा सरकारने मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अयोध्येत राम मंदिर बांधले आणि आता भाजपा सरकार मथुरेतील कृष्ण जन्मभूमी मंदिर बांधेल, असा विश्वास लोकांना आहे,” असे माहेश्वरी सांगतात. हाथरस मतदारसंघ मथुरेला लागून आहे.

सपा-काँग्रेस युतीने या जागेवर सपा उमेवार उभा केला आहे. सपा उमेदवार जसवीर वाल्मीकी यांनी आपल्या प्रचारात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु, त्यांनी २०२० च्या प्रकरणाचा थेट उल्लेख केला नाही. ते म्हणाले, “ती घटना म्हणजे सरकारचे अपयश आहे. कोई भी जाती कोई काम नहीं करती है; वो एक व्यक्ती करती है (कोणतेही कृत्य जात करत नाही; तर ते एक व्यक्ती करते).” ते पुढे म्हणाले, “पीडित तरुणी दलित होती. मणिपूरमध्येही तसेच घडले (महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड काढण्यात आली). त्यासुद्धा देशाच्या कन्या होत्या. दिल्लीत आंदोलने करणार्‍या पैलवानही आमच्या बहिणी आणि मुली आहेत. त्यामुळे आपल्याला संपूर्ण समाजासाठी लढावे लागेल.” जसवीर वाल्मीकी हे प्रामुख्याने बेरोजगारी, महागाई व शिक्षणाचा घसरलेला दर्जा या मुद्द्यांवर प्रचार करीत आहेत.

काँग्रेसचे शहराध्यक्ष विनोद कुमार कर्दम जाटव दलित आहेत. ते मान्य करतात की, उच्चवर्णीय मतदार सामूहिक बलात्काराच्या मुद्द्यावर बोलल्यास नाराज होतील. “भाजपाचे उमेदवार जसवीर स्थानिक नसल्यामुळे त्यांना जिंकण्याची संधी कमी आहे. सपानेही सहारणपूर येथील देवबंदमधला उमेदवार निवडला आहे; जे ठिकाण हाथरसपासून सुमारे ३५० किमी अंतरावर आहे. त्यांनाही स्थानिक लोक ओळखत नाहीत,” असे कर्दम म्हणतात. मात्र, जसवीर यांनी ‘बाहेरील’ असल्याचा आरोप फेटाळला. ते म्हणाले, त्यांचे ‘नानिहाल’ (आईकडील कुटुंब) हाथरसमध्ये राहते आणि त्यांचे आजोबाही इथलेच आहेत.बसप दलित मतांचा प्रमुख दावेदार आहे. दलित समुदायाची संख्या हाथरसमध्ये तीन लाख इतकी आहे. “बहनजी (बसपा प्रमुख मायावती) आणि इतर पक्षांचे नेते भाजपासारखे सक्रिय नाहीत. पण, तरीही मी बसपच्या उमेदवाराला मत देतो. कारण – जाटव हा दलितांची काळजी घेणारा एकमेव पक्ष आहे,” असे माजी ग्राम प्रधान व हाथरसमधील नागला हरिकेश गावातील रहिवासी शशी कपूर सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button