ठाणे

डोंंबिवलीतील दोन जणांचा मृत्यू ,लोकलमधून पडून

दिवा ते मुंब्राआणि डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान या दुर्देवी घटना घडल्या आहेत.

डोंंबिवली: छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात तुडुंब गर्दी असल्याने डब्यात शिरता न आल्याने लोकलच्या दरवाजात दाटीवाटीने उभे राहून प्रवास करणाऱ्या एका तरूणाचा, एका तरूणीचा दोन दिवसांत लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवली ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान या दुर्देवी घटना घडल्या आहेत. लोकलची संख्या वाढवुनही लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षात डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सुमारे ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ८०० हून अधिक लोकल मधून पडून जखमी झाले आहेत. रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. तरीही ही अपघातांंची मालिका संपत नाही. लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रिया श्यामजी राजगोर (२६) या तरूणीचा मृत्यू झाला. डोंबिवली रेल्वे स्थानकात रियाने सोमवारी सकाळी मुंबईला जाणारी लोकल पकडली. डब्यातील गर्दीमुळे तिला डब्यात शिरता आले नाही. ती लोकलच्या दरवाजात उभी राहून प्रवास करत होती. डोंबिवली स्थानकानंतर लोकलने वेग घेतल्याने कोपर रेल्वे स्थानकाजवळ तिचा तोल गेला आणि ती रेल्वे मार्गात पडून जागीच मरण पावली.
ती ठाण्यातील एका बांंधकाम कंपनीत कामाला होती. डोंबिवलीतील अवधेश दुबे या तरुणाचा दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या खाडीत पडून मृत्यू झाला आहे. तो लोकलने मुंबईच्या दिशेेने प्रवास करत होता. डब्यात गर्दी असल्याने तो दरवाजाला लटकून प्रवास करत होता. मुंब्रा खाडीजवळ लोकलच्या दरवाजाला त्याने धरलेला हात सटकला तो खाडीत पडला असे पोलिसांंचे म्हणणे आहे. अवधेशची कार्यालयीन पिशवी गायब असल्याचे कुटु्ंबीयांनी सांगितले. यामध्ये काही घातपात असण्याचा संंशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. जाणकारांंकडून मिळालेली माहिती अशी की, कोपर ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकल वेगात असताना रुळांवरून डबे दोन्ही बाजुला वेगाने कलताना दिसतात. यावेळी दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशावर आतील गर्दीचा भार येतो. किंवा त्या प्रवाशाला दरवाजाच्या दांडीला हात धरून उभे राहणे मुश्किल होते. यावेळी त्याचा तोल जाऊन तो रेल्वे मार्गात पडतो. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button