maharastraसत्ताकारण

बावनकुळे पुन्हा विधानसभेच्या रिंगणात?

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर भाजपने सावध पवित्रा घेतला असून विजयाची खात्री असलेला उमेदवार म्हणून बावनकुळे यांची निवड करण्यात येण्याची शक्यता आहे.

चंद्रशेखर बावनकुळे २०१९ मध्ये उमेदवारी नाकारण्यात आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष यंदा पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. २००४ मध्ये प्रथमच तेथे बावनकुळे यांनी भाजपला विजय मिळवून दिला. त्यानंतर झालेल्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत विजयी होऊन त्यांनी या मतदारसंघावर आपली पकड घट्ट केली होती. २०१४ मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यावर त्यांच्याकडे ऊर्जा हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. त्यांच्याकडे नागपूरचे पालकमंत्रीपदही होते. याआधारे त्यांनी मतदारसंघावरील पकड अधिक घट्ट केली. असे असताना २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारून साऱ्यांनाच धक्का दिला. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयापुढे मान तुकवत बावनकुळे यांनी पक्षाने दिलेले उमेदवार टेकचंद सावरकर यांच्यासाठी काम करत त्यांना निवडून आणले. मात्र, याचे फळ त्यांना नंतर मिळाले. २०२२ मध्ये त्यांना विधान परिषदेवर निवडून आणण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपदीही नेमण्यात आले. तेव्हापासून बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने लढवल्या. मात्र त्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. २०२४ विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. लोकसभेत पक्षाचा झालेला पराभव लक्षात घेता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता पक्षाकडून बावनकुळे यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी विद्यामान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापले जाऊ शकते. २०१९ मध्ये भाजपने बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील दोन विद्यामान आमदारांना तिकीट नाकारले होते हे येथे उल्लेखनीय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कामठी विधानसभा मतदारसंघात माघारला होता. ही बाबही विद्यामान आमदार सावरकर यांच्याविरोधात जाऊ शकते. बावनकुळे पुन्हा विधानसभा निवडणूक रिंगणात उतरल्यास या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पारंपरिक लढत होऊ शकते. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. काँगेस नेते सुनील केदार आणि मुकुल वासनिक यांची भूमिका उमेदवार निश्चित करताना महत्त्वाची ठरणार आहे. कामठीत सध्या भाजपचे विद्यामान आमदार आहेत. त्यामुळे विद्यामान आमदाराला उमेदवारी नाकारून बावनकुळे यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाणार का, हा खरा प्रश्न आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button