नवी मुंबई

दोन जणांवर जबरी लुटीचा गुन्हा दाखल; तरुणीच्या प्रसंगावधानामुळे साखळीचोर जेरबंद

 वाशी : एका तरुणीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सोन्याची साखळी खेचून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला चोर पोलिसांच्या हाती लागल्याची घटना सोमवारी रात्री कोपरी गावात घडली. यावेळी झालेल्या झटापटीत चोराचा साथीदार स्कूटी घेऊन पळून गेला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या चोराचे नाव सिद्धार्थ मौर्या (२७) असे असून पळून गेलेल्या त्याच्या साथीदाराचे नाव रोहित तुपे असे आहे. तर, या चोराला पकडणारी आर्ची वैश्य (२०) ही तरुणी कोपरी गावात कुटुंबीयासह राहण्यास असून सध्या ती मास मीडियाचे शिक्षण घेत आहे.आर्चीला तिच्या बहिणीसाठी नवीन मोबाइल फोन खरेदी करायचा होता. त्यासाठी ती घरातून बाहेर पडली होती.  ती स्वामी विवेकानंद शाळेसमोरून पायी चालत जात असताना, तिच्या समोरून स्कूटीवरून सिद्धार्थ मौर्या व त्याचा साथीदार रोहित तुपे हे दोघे आले. स्कूटीवर पाठीमागे बसलेल्या सिद्धार्थ याने आर्चीच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने खेचली.

यावेळी आर्चीने प्रसंगावधान दाखवत सिद्धार्थचा हात पकडून त्याला स्कूटीवरून खाली ओढल्याने तो उतरला. त्यानंतर त्याने आर्चीला ढकलून देत तिला खाली पाडले. दोघांच्यात झटापट झाली. तिने उठून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि जोरजोरात आरडा-ओरड केल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीने सिद्धार्थला पकडले. तर, त्याचा साथीदार रोहित हा स्कूटी घेऊन पळून गेला. नागरिकांनी सिद्धार्थ याला एपीएमसी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button