मुंबई

तपास थांबवण्याआधी पोलिसांचा अखेरचा डाव, सगळे म्हणाले, तो तर कधीच मेला! ३० वर्षांनी तो अडकलाच

मुंबई : वडाळा पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी ३० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. शोध मोहिमेत या आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत होती. नेमकं काही कळत नसल्याने पोलिसांनी शक्कल लढवली. आरोपीच्या उत्तर प्रदेश येथील घराच्या पत्त्यावर काही रक्कम मनीऑर्डरने पाठविले. पैसे घेण्यासाठी आरोपी आल्याने जिवंत असल्याची खात्री पटली आणि अखेर ३० वर्षांनी पोलिसांनी आरोपीला कल्याण येथून शोधून काढले.

वडाळा पोलिस ठाण्यात १९९३ मध्ये दाखल असलेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये दशरथ राजभर याला पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर न्यायालयात खटल्याच्या तारखांना दशरथ उपस्थित राहत नव्हता. अनेक वर्षे गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. पोलिसांच्या नोंदीमध्ये दशरथ याचा फोटो नव्हता. मात्र मुंबईतील आणि उत्तर प्रदेश येथील घराचा पत्ता होता.पोलिसांनी दोन्ही ठिकाणी जाऊन पाहिले मात्र काहीच सुगावा लागत नव्हता. अनेकांनी तपासादरम्यान दशरथ याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तपास बंद करण्यापूर्वी पोलिसांनी आणखी एक डाव टाकला आणि दशरथ याच्या उत्तर प्रदेशातील पत्त्यावर एक मनी ऑर्डर पाठवली. दशरथ हा घरी येऊन पैसे घेऊन गेल्याचे समजले.

पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील दशरथचे घर गाठले. मात्र त्याआधीच तो गायब झाला होता. तो जिवंत असल्याचे कळल्यावर पोलिसांनी अधिक खोलवर जाऊन त्याचा शोध सुरू केला. त्याच्या परिचयातील व्यक्तींवर नजर ठेवली असताना दशरथ हा कल्याण येथे राहत असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने कल्याण पूर्वेकडील नांदिवली तलावाजवळून दशरथ याला शोधून काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button