मुंबई पोलिसांची बांगलादेशी महिलांविरुध्द धडक कारवाई; ‘इतक्या’ महिलांना केलं अटक
मुंबई : मुंबई पोलिसांनी बांगलादेशी महिलां विरोधात धडक कारवाई सुरु केलीये. मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी मोहीम उघडली आहे. मुंबई पोलिसांनी मागील सहा महिन्यात पश्चिम उपनगरातील मालाड मालवणी, बोरिवली दहिसर गणपत पाटील नगर यांसारख्या परिसरातून दहापेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली आहे. अशाच पद्धतीनं अवैधरित्या मुंबईच्या दहिसर परिसरात राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष १२ ने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्हीही बांगलादेशी महिला फेब्रुवारी २०२३ पासून मुंबईच्या दहिसर परिसरात राहत आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलांचं वय वीस असून २९ वर्ष असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर परिसरात दोन बांगलादेशी महिला फेब्रुवारी २०२३ पासून अवैधरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे सपोनि रासकर यांना मिळाली.
या माहितीवरून दोन्ही महिलांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यांचा पत्ता शोधून काढला. मिळालेल्या पत्त्यावरून त्या दोन्हीही महिलांचा शोध घेतला. त्या दोन्ही महिलांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडं भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे कोणतेही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नव्हतं. त्यांच्या फोनमधील नंबर तपासून पाहिले असता त्यांचं संभाषण नेहमी बांगलादेशमधील त्यांच्या नातेवाईकांसोबत होत असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्या दोघीही बांगलादेशी असल्याची खात्री पटली, म्हणून त्या दोघींनाही गुन्हे शाखा कक्ष बाराच्या टीमनं ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. प्रभारी पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, सपोनि विजय रासकर, कारंडे, लक्ष्मण बागवे, कल्पेश सावंत, बालकृष्ण लिम्हण, विनोद अहिरे, संतोष बने, शैलेश बिचकर, अमोल राणे, विशाल गोमे, प्रसाद गोरुले, शैलेश सोनावणे, चंद्रकांत शिरसाट,आण्णा मोरे या तपास पथकानं ही यशस्वी कारवाई केली.